कोल्हापुरातील पूरग्रस्त गाव सलमान खानकडून दत्तक

Thote Shubham

कोल्हापूर : बॉलिवूडचा ‘बॉडीगार्ड’ अभिनेता सलमान खान कोल्हापुरातील पुराचा फटका बसलेल्या गावासाठी ‘गार्ड’ ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.

 

ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरं पुन्हा बांधून देण्यासाठी ‘भाईजान’ने उशिरा का असेना, धाव घेतली आहे.

 

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी सलमान पक्की घरं बांधून देणार आहे. अद्याप सलमान खानकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

 

ठाकरे सरकार आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने ही कामं केली जाणार आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनासोबत एलान फाऊंडेशनने या योजनेसाठी करार केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सात सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे.

 

‘भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा लहानसा प्रयत्न आहे. सहकार्याबद्दल सलमान खानचे आभार’ अशी प्रतिक्रिया ‘एलान फाऊंडेशन’च्या संचालकांनी व्यक्त केली.               

Find Out More:

Related Articles: